Friday, 5 January 2018

किल्ले तोरणा (Kille Torna Trek) 31/12/2017 & 1/01/2018

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशामहाराष्ट्राचे असे वर्णन ज्या सह्याद्रीमुळे केले जाते, ज्या सह्याद्रीला माझ्या गडकोटांचं, लेण्यांच कोंदण लाभलंय, ज्या सह्याद्रीला माझ्यासारखे अनेक दुर्गवेडे आणि निसर्गप्रेमी माय बाप मानतात, अश्या सह्याद्रीमधून पुन्हा खूप सुंदर आठवणींची शिदोरी  घेऊन घरी आलो. गेली 8 वर्षे नवीन कॅलेंडर वर्षाचा पहिला दिवस सह्याद्रीच्या सानिध्यात घालवत आलो आहे. या वर्षी बेत ठरला तो तोरणा गडाचा. हल्ली प्रामाणिक ट्रेकर्स सोबत, अनेक हौशी व केवळ मजेसाठी गडावर येणारे लोक पण गडावर येतात मोठ मोठ्याने गाणी लावून गडावरील त्या शांततेचा भंग करतात म्हणून अशी गर्दी टाळण्यासाठी आणि 30 लोकांची जेवण आणि निवाऱ्याची व्यवस्था होऊ शकेल या दृष्टीने तोरणा गडाची निवड केली. 
सह्याद्री म्हणजे गडकोटांची एक अफाट रांग, पण जसे एखाद्या दागिन्यात अनेक हिरे, माणके असतात तसेच सह्याद्रीतील काही गडकोट आपली विशेषण मानाने मिरवत आहेत, त्यातीलच एक व आपलं विशेषण जपणारा किल्ला म्हणजे तोरणा किल्ला. प्रचंडगड किंवा गरुडाचे घर म्हणून प्रसिद्ध असलेला, स्वराज्याची पहिली राजधानी राजगडासोबत दिमाखात उभा असलेला असा हा किल्ला. 

31 तारखेला रविवार आल्यामुळे 2 दिवसांचा ट्रेक करण शक्य होत होत. मुंबईहून शनिवारी, 30 डिसेंबरला खाजगी वाहनाने निघालो. सोबत 29 जणांचा चमू होता. पुण्याहून साधारण 64 किमीवर तोरणा किल्ला आहे. पुणे सोडल्यावर पुणे- सातारा रोड वरील नसरापूर फाट्यापासून 30 किमी वर किल्ला आहे. तोरण्याकडे जाताना सिंहगड किल्ला मी इथे आहे याची आठवण करून देतो. सोबतीला पुढे राजगड आहेच. तोरण्याचा अलिकडूनच राजगडाकडे (गुंजवणे गावाकडे) जाणारा मार्ग आहे.


पहाटेच वेल्हामध्ये गावात पोहोचलो. वेल्हे गावातून गडाचा घेरा दिसून येतो, झुंजार माची ची प्रचंडता इथून पहावयास मिळते. वर सोंडेवर पोहोचलो तरी मात्र बिनी दरवाजा काही दिसत नाही. मुळात गडाचे दरवाजे कुठून असतील याचा अंदाज खालून घेताच येत नाही. बुधला माची ची प्रचंडता पाहवयास मात्र आपल्याला बालेकिल्ल्यावर जावंच लागत. अजस्त्र पसरलेली माची त्यावर एखाद्या सुवाशिनीच्या मंगळसूत्रामधील चकाकणाऱ्या काळ्या मण्यासारखा भासणारं बुधला लांबून पण लक्ष वेधून घेतो. 3 तासाच्या चढाई नंतर मेंगाई देवीच्या मंदिरात पोहोचलो. हल्लीच गावातून थोड्यावर पठारावर येण्यासाठी एक गाडीमार्ग झाला आहे, लहान 4 चाकी गाडी येऊ शकते इथपर्यंत. एक तासाभराची चढाई सहज वाचते त्यामुळे.

सर्व चमुची जेवणाची व्यवस्था यशवंती टीम करणार असल्यामुळे अनेक जणांच्या बॅगा 20-25 किलोच्या झालेल्या. ती बॅग खांद्यावरून उत्तरावल्यानंतर अगदी हवेत चालल्याचा भास होत होता. दुपारचे जेवणाचा बेत भात आणि कुळीथाच पिठलं. आमचे आचारी आणि त्या दोन दिवसांचे अन्नदाते हसमुख आणि ऋचा यांच्या कृपेमुळे जेवण मिळाले. दुपारची थोडी विश्रांती घेऊन झुंजार माची दाखविण्याची ठरले. बालेकिल्यावरून एक शिडीद्वारे झुंजार माचीच्या पहिल्या बुरुजावर उतल्यावर झुंजार माचीचे खरे सौन्दर्य दिसते. शत्रूवर अचूक मारा करण्यास अगदी योग्य ठिकाण म्हणजे झुंजार माची. इथे एक दिंडी दरवाजा पण आहे. तेथून आपली मान सांभाळत खाली उतरल्यावर चिलखती बुरुजावर उतरतो, इथूनच उजवीकडून मुख्य माचीच्या टोकाच्या बुरुजावर उतरण्यास मार्ग आहे. मार्ग कसला खरंतर कडाच आहे, इथून जराशी तरी चूक झाली तरी सरळ खोल दरीत खाली. इंग्रजीतल्या उलटा व्ही ( ^) आकाराचा हा बुरुज झुंजार माचीची खरी शान. एक पाण्याचं टाक, बुरुजावर जाणाऱ्या पायऱ्या अजूनही सुस्थितीत आहेत. इथल्या चिलखती बुरुजावर उतरणारा दिंडी दरवाजा फार लोभस आहे. चिलखती बुरुज फार भक्कम आहे इथला. 
इथूनच डावीकडे राजगड आपल्याला साद देत असतो. वानरांची टोळी आम्हाला जणू परग्रहावरून आलेल्या माणसासारखी टक मक पाहत होती.

सूर्यास्ताच्या वेळी पर्यंत पुन्हा मंदिराच्या परिसरात येऊन तंबू लावणे आणि रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली. घरी जाणाऱ्या सूर्याच्या किरणांनी तयार झालेल्या तांबडी कॅनवासवर बालेकिल्ल्याचा एका बुरुजाचा फार सुंदर फोटो मिळाला. तसाच जाणाऱ्या सूर्याच्या सोनेरी किरणांवर मेंगाई देवी च्या मंदिराचा पण मस्त फोटो मिळाला. जशी सायंकाळ उतरत गेली तशी थंडी वाढत होती त्यात बोचरा वारा अजून त्रास देत होता. तंबू असल्यामुळे निदान वारा तरी त्रास देत नव्हता. आदल्यादिवशीचा रात्रीचा प्रवास आणि दमछाक करणारी चढाई आणि भटकंती यामुळे रात्री गपचूप झोपले सगळे. सकाळी उठलो तेव्हा अगदी राजगडाच्या मागच्या बाजुहून सुर्यमामा च्या आगमनाची चाहूल येऊ लागली. संपूर्ण आकाशावर तांबडं पसरण्यास सुरुवात झाली होती. आणि सूर्याचे आगमन झाले तेव्हा त्याचे रूप बघून असं वाटलं की कदाचित याच उगवत्या सूर्याची प्रेरणा रोज महाराज घेत असत. सूर्योदयाच्या त्या क्षणाला स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडकडे पाहून असं मनात आलं कि किल्ले राजगडावरील प्रत्येक दगड सूर्याला सांगत असावा की तुझ्याइतकच तेज देणारा जाणता राजा माझ्या अंगा खांद्यावर खेळला. ते सूर्योदयाचे अप्रतिम क्षण केमरात साठवून नाश्ता करण्याची तयारी सुरू केली. लगोलग पोहे आणि चहा असा नाश्ता करून बुधला माचीकडे कूच केली.
बालेकिल्ल्यावरील कोकण दरवाजाची शासनतर्फे डागडुजी करण्यात आली आहे. तिथून पुढे हत्ती नाळ च्या बाजूने बुधला माचीवर उतरण्यास सुरुवात केली. हल्ली अनेक ठिकाणी रेलिंग्स लावले आहेत. काही वर्षांपूर्वी याच मार्गावर दोन हात करून उतराव लागत असे. इथूनच पुढे बुधल्याच्या डाव्याबाजूने बुरुजावर जाता येते इथूनच राजगडाकडे जाणारी वाट आहे. साधारण 7- 8 तासात इथून राजगडावर पोहोचता येते. चित्ता दरवाजा, वाकजाई दरवाजा तसे अजूनही दुर्लक्षितच वाटतात. इथूनच पुढे बुधल्याच्या पुढच्या बाजुला एक छोटासा सुळका आहे तेथेही वर चढत जाता येते. साधारण 2- 2.30 तास तरी नक्की जातात बुधला माची बघण्यासाठी. दुपारचे जेवण गडाखालील तोरणा विहार हॉटेल मध्ये असल्याकारणाने असल्यामुळं वेळेत खाली उतरण गरजेचं होतं. उन्ह वाढत होत, म्हणून लगोलग सर्वांना गड उतरविण्यास सुरुवात केली. उतरतेवेळी मधमाश्यांच्या एका समूहाने अचानक हल्ला चढवला पण त्यात कोणाला दुखापत नाही झाली नशीब. हल्ली राजगडावर तर मधमाश्यांचा हल्ला नेहमीचाच झालेला ऐकण्यात येतो. साधारण २ तासात गरुडाच्या घरट्यातून मानवी वस्तीत आलो. गडाखालील हॉटेल मध्ये जेवण करून परतीचा प्रवास सुरु केला. एक आयुष्यभर पुरेल अश्या आठवणींची शिदोरी घेऊन परत मुंबईत यायला निघालो पण जीव मात्र तिथेच अडकलेला...

वेल्हे गावात जाण्यासाठी सकाळी ६.३० वाजता स्वारगेट स्थानकातून पहिली एस. टी. आहे नंतर १.३० -२  तासाच्या अंतराने बस उपलब्ध आहेत. गडावर पोहोचण्यास २.३० तास पुरेसे होतात. पाण्याची उपलब्धता असली तरी एक छोट्याश्या स्रोतातुन येणारे  पाणी फक्त पिण्यायोग्य आहे. गडावर राहण्याची व्यवस्था मेंगाई देवी मंदिर व त्यासमोर मंदिर, दारू कोठार व इतर ठिकाणी तंबू ठोकून करता येते. जेवणाची व्यवस्था मात्र आपली आपणच करावी लागते. तसे काही गावकरी गडावरवर मसाले भात, चहा, पोहे, पाण्याची बाटली असे पदार्थ पुरवितात मात्र मोठा ग्रुप असेल तर आपली व्यवस्था आपणचं करावी. 

धन्यवाद,

गौरव भावे,


यशवंती Adventures, गिरगांव

काही फोटो:- 

































Monday, 12 September 2016

सिद्धगड-आहुपे- खोपिवली घाटवाट ट्रेक

जशी श्रावणात नवी पालवी फुटत असते तसेच आज मनाला एक नवी पालवी फुटत होती.
आज मनाच्या दोन्ही बाजूंना अनुभवत होतो, एका बाजूला होणाऱ्या बायकोशी भांडून आल्याचं वाईट आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा सह्याद्रीत जात असल्याच सुख. साला आमचं मन आणि डोकं सह्याद्रीत गेलो की लेखणीच उचलायला लागते, हा आता लेखणीची जागा मोबाईल फोन च्या "स्पर्श पाटी" ने घेतली ती गोष्ट वेगळी.
शनिवारी रात्री पर्यंत अनेक प्लॅन ठरून रद्द केल्यानंतर शेवाटी सिद्धगड- आहुपे प्लॅन ठरला. तरी एका भिडू ने सकाळी आयत्यावेळी बायकोला बर नव्हतं म्हणून घरी बसला. ( नावापुरता कारण मला तर वाटत रात्री आयत्यावेळी सांगितलं म्हणून बायकोशी रात्री भांडला असेल). निघालो 4 जण मग हो नाही करता करता.
छत्रपती शिवाजी टर्मिनल वरून कल्याण साठी सकाळी 9 वाजता ची ट्रेन पकडली. 10 वाजता कल्याण एसटी डेपो ला पोहोचलो, तिथून 10.05 ची लागलेली मुरबाड गाडी पकडली. हि एसटी म्हणजे आम्हाला आशीर्वादाच जणू, सगळी कोपऱ्यातील गाव पण जोडली गेली म्हणून आम्ही जाऊ शकलो. आणि त्यातली सीट म्हणजे मसाज पार्लरचं. 11.10 वाजता मुरबाडला पोहोचलो, तिथून लगेच 11.15 वाजता सुटणारी, नारीवली मार्गे जाणारी गोरखगड गाडी पकडली. रास्ता तसा अरुंदच होता, एका वेळी एक एसटी जाईल एव्हढाच. सलाम एसटी चालकांना. "कोना कोना ...." असं ब्रीद मिरवणाऱ्या बँकेला पण हे कोने माहित नसतील.
माणुसकी जिवंत असल्याचा अनुभव आला, एसटी हे एकमात्र वाहन अशा ठिकाणी घरी जायला. आमच्या चालक मामाने आरशातून बसच्या मागे धावत येणारा एक 65 ची च्या घरातला मानूस पहिला आणि त्याने गाडी थांबवली 3-4 मिनिट. नाहीतर आपले टॅक्सीवाले, माजच असतो त्यांना.
खडतर, अरुंद रस्त्याने सुखरूप पणे आम्ही उचले या गावी पोहोचलो. सिद्धगडावर अलीकडच्या नारीवली या गावातून पण जाता येते. उचल्याहून निघाल्यावर एक लहानसा ओढा लागतो तो सोडल्यावर उजव्याबाजूने सिद्धगडाला जाते तर डावीकडची गोरखगडाला. उजवीकडून गेल्यावर अजून एक ओढा लागला, मग शेत बांध्यावरून आम्ही खालील वाडीत पोहोचलो. मुळात सिद्धगडवाडीत वाडीत राहणारी अनेक कुटुंब आता खाली आली आहेत या वाडीत. याच वाडीतून वाट वर जाते. गडावरून येणार खळखळाता ओढा कानांना आनंद देत होता. याच ओढ्याला उजव्या हाताला ठेऊन आम्ही चढ सुरु केला. वाटेत एक झोपडी लागली, वाट तशी घनदाट जंगलातूनच जाते. त्यात भीमाशंकर उभारण्याचा हा भाग म्हणजे सदैव पाऊस आणि धुकं. इथूनच साधारण तासाभराच्या चढाई नंतर खळ खळणाऱ्या ओढ्याला ओलांडून जाण्याची वेळ येते. तिथेच आम्ही वन भोजन करून चढाईला सुरुवात केली. या ओढ्यापासून साधारण आजून तासाभराच्या चढाई नंतर आम्ही महादरावाज्यापाशी आलो, तटबंदी उरलेली नाहीये आता पण सुंदर दरवाजा आहे. याच दरवाज्याचा बाहेरील अंगाला असणाऱ्या पठारावर एक सुंदर शिवकालीन स्मारक दिसते, या मोकळ्या पठारावर धुक्यात लपलेला सिद्धगड माथा उजव्या अंगाला आणि डावीकडील भीमाशंकर पर्वत रांगे मधील डोंगर पाहताना मन तृप्त होते.
अचानक लक्ष गेले ते सिद्धगडाच्या कातळ कड्यात लपलेल्या एका कोरीव गुफेकडे ( तो बाबा राहायचा ती गुफा नव्हे, त्या व्यतिरिक्त एक कोरीव गुफा आहे आणि त्यापेक्षाही मोठी.) पुढच्यावेळी ह्या गुफेत जाण्याचा मार्ग नक्की शोधणार. गावकऱ्यांकडून समजलं की वर जाणारी एक पायवाट आहे. ते सह्य-सौन्दर्य आणि गुंफेच गूढ मनात साचवुन आम्ही पुन्हा महादरावाज्यात प्रवेश केला . प्रवेश केल्यावर डावीकडे एक मंदिर लागते. मंदिराचं रूप मन सुखावून टाकत. आणि मुख्य म्हणजे मंदिर सुस्थितीत आहे. मंदिराच्या आजूबाजूला अनेक शिळा पडलेल्या सापडतात. एक उघड्यावरील गणेश मंदिर दिसते. एक तोफ सुद्धा आहे इथे. कदाचित ती वरून कोसळलेली असावी. हि अशी मंदिरचं आम्हा भटाक्यांचं आश्रयस्थान.
इथूनच पुढे सिद्धगड वाडी ( अवकाशातील गाव असच म्हणतो मी या वाडीला). गावात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच घर उरली आहेत, काही वर्षात ती पण जातील कारण एका बाजूला जमीन खाचल्यामुळे या वाडीतील लोकांना गडाखालील गावात जागा दिली आहे.
इथे एक शाळा सुद्धा आहे पण आता शाळा बंद झालीये आणि गावातील काही तरुण रात्री निवाऱ्यासाठी वापर करतात आणि शनिवार रविवार आमच्यासारखे भटक्यांना आधार. इथूनच शाळेच्या मागून सिद्धगड माथ्यावर जाण्यास साधारण दीड तास लागतो, खडी चढ अंगावर काटा आणते. वाटेत एक गुफा आहे, तिथे पूर्वी एक बाबा राहायचा, त्याचा निवारा होता तो. अखंड कातळात कोरलेली हि गुफा म्हणजे एक आश्रर्यच आहे. गुफेच्या बाहेर लिहिलंय "ब्रह्मांडाची उघडी गुरुकिल्ली". या वाक्याचा बोध प्रत्येकाने घ्यावा. इथे बसल्यावर स्वत्वाचा शोध लागणारचं. ह मानसिक आणि  नेत्रसुख कुठेही मिळणार नाही. गुफेपासून वर अर्ध्यातासाच्या चढाई नंतर माथा लागतो, फार अवशेश नाहीयेत. दोन्ही बाजूंना दोन बुरुज त्यात उजवीकडील बुरुज अजूनही शाबूत, तिथेच एक एका पडलेला दरवाजा. इथून गोरखगड आणि मच्छिन्द्रगडाचे सुळके नजर वळवून घेतात. खालील सिद्धगड वाडीही चिमुकली दिसू लागते. पावसात माथ्यावर न जाणचं योग्य. बाकीच्यावेळी माथावरून दिसणारे दृश्य विहंगम. माथ्यावरच पाण्याची 4 टाकी आणि उघड्यावर वसलेलं एक मंदिर आहे. खाली उतरताना खूप सांभाळून उतरावे लागते. डिसेंबर मध्ये आलेलो तेव्हा अनेक नावख्यांचा चड्यांचा रंग मागून लाल झालेला. बसत बसत उतरलेले. वरील वाडीत जेवणाची व्यवस्था गावकरी करतात, जास्त जण असतील तर मात्र पंचाईत होते . आधी कळवा किंवा सामान घेऊन जा.
आम्ही रात्री मंदिरात मुक्काम करायचं ठरवलं. दिवसा सुंदर वाटणार मंदिर रात्री मात्र भयाण रूप घेत. आजू बाजूला कोणीही नाही त्यात जंगली जनावारांचे आवाज झोप उडवून टाकतात. पावसाने सुरु केलेला ताशा, रातकिड्यांचे आवाज, मध्येच येणार पावलांचा आवाज झोप उडवून टाकली. वाटलं पहाट होईल इतक्यात म्हणून घड्याळ पाहिलं तर फक्त रात्रीचे 11 वाजलेले. रात्र कशी जाईल याच टेन्शन यायला लागल होत. आमच्यातील आमचा बैल मित्र झोपला हातपाय पसरून आम्ही तिघेच जागे. वेळ जात नव्हता मग एकाने मोबाइल बाहेर काढला आणि सांगितलं सिनेमा बघूया. एकमत झाल आणि सकाळी 4 वाजेपर्यंत सुपर स्टार चा "कबाली" आणि कधी पहाणार पण नाही असा "ढिशुम" पहिला. 4 वाजता कुठे झोप लागली. सकाळी 7 वाजता उठून आवरलं पटापट कारण अजून आहुपे घाट करायचा होता. सकाळी 7.50 ला मंदिर सोडले. दारावाज्यापासून आडवी डोंगरांना चिकटून गेलेली वाट चालत होतो, काही ठिकाणी वाट कोसळली आहे. डोंगरातून येणारे 3 ओढे पार केल्यानंतर एका खड्या चढाई ने एका मोकळ्या कातळावर पोहोचलो. जीव काढणारीच चढ होती ती. थोडा आराम केल्यानंतर चालण्यास सुरुवात केली, इथे दोन वाटा फुटतात, सरळ जाणारी भीमाशंकर तर उजवीकडे जंगलात गेलेली आहुपे गावाकडे. एव्हाना इथवर यायला 9 वाजलेले. अहुप्याकडे जाणाऱ्या किर्रर्र झाडीत शिरलो आम्ही. सकाळी सुद्धा रात्रीचा अनुभव येत होता. या पठारावर सदैव धुकं माजलेल असत त्यामुळे माहित नसेल वाट तर न जाणच बर नाहीतर कुठे  भटकाल याचा पत्ता लागायचा नाही. एक पठार पार केल्यावर पुन्हा एका तिरप्या चढाईला लागलो ती पार करून पुन्हा एक मोकळे पठार लागले. परत झाडीत प्रवेश करून एका मोकळ्या पठारावर लागलो, मग पठारावरून मार्ग काढत भीमाशंकर वरून येणाऱ्या मोठ्या वाटेला  लागलो . पण ही वाट नसेल माहित तर वाटाड्या घेतलेलाच बरा नाहीतर 100% हरवणार. ज्या मोठ्या वाटेला लागलो तिथून भीमाशंकर वरून पूर्वी गाडी वाट होती अस एक गावकरी म्हणत होता. हीच वाट न सोडता सरळ उतरत गेलो. वाटेत मधेच एका मोठ्या कातळावर आपल्या देशाच्या नाकाशास्वरूपी कोरलेल्या पण गणपती स्वरूप दिसणाऱ्या देवस्थानाचे दर्शन झाले. पुढे एक मेंढी, गायीचं कळप चरायला घेऊन जाणाऱ्या आजीचे दर्शन झाले. तब्बल 5-6 तासानंतर एक माणूस दिसला मधल्या काळात कोणच नव्हतं, आम्हीच 4 माकड. आजी जेव्हा संगीतल सिद्धगडावरून आलो तेव्हा तिला विश्वासच बसेना म्हणाली या दिवसात नाही येत तिथुन कोणी. तिच्याकडे आष्यर्यपूर्वक नजरेने बघत आम्ही आहुपे गावाच्या वाटेला लागलो. सिद्धगडावरून निघाल्या नंतर चार - साडे चार तास लागले होते इथे यायला. गाव तस सुधारालाय आता. इक महाविद्यालय, एक आश्रम बांधला गेलाय. इथला कातळकडा घाटावर आल्याची जाणीव करावुन देतो.
डांबरी रस्त्याला लागून पुन्हा डावीकडे वाट चालू केली आम्ही कारण आम्हाला खोपिवली ला उतरायचं होत इथून. खालील कोकणाची खोली इथून दिसते. अजस्त्र कडे भीती देतात. इथूनच उतरावं लागणार होत आम्हाला. एका नजरेत भरणाऱ्या गर्द झाडीतून हि वाट खाली उतरते. कड्याकपरीतून उतरण्याचा अनुभव जबरदस्त येत होता. जसे जसे खाली उतरत होतो तसे तसे अंगावर येणारा कडा रौद्र वाटत होता. वाटेत एका कातळात कोरलेली 2 पाण्याची टाकी दिसली. पुरवी घाट वाटेकऱ्यांसाठी कि केलेली सुविधा असावी. थोड्याच वेळात गोरख आणि मच्छिन्द्रगडाचे दुसऱ्या अंगाने दर्शन झाले. गर्द रानातून या वाटेने आम्ही खाली आलो तेव्हा स्वछ आणि खळ खळत्या ओढ्यात अंघोळ करण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. 2 दिवसाच्या श्रमाचा परिहार घेत होतो आम्ही त्या पाण्यात. इथूनच थोड्याच अंतरावर खोपिवली गाव लागले. आम्ही खोपिवली- म्हसा- मुरबाड- कल्याण असा प्रवास करत मुंबईस परतलो.
फार सुखद अनुभव होता हा. 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट मोठा वीकएंड आला होता, शनिवार, रविवार आणि सोमवार सुट्टी म्हणून सगळेच बाहेर पडले असतील सह्याद्रीत. नको असलेली गर्दी टाळण्यासाठी हा ट्रेक निवडला आणि आयुष्यभर पुरेल एव्हडा अनुभव घेऊन आलो परत.


गौरव भावे.

Tuesday, 25 November 2014

Kille Sarasgad किल्ले सरसगड

किल्ले सरसगड

नावाप्रमाचेच सरस असणारा हा किल्ला. पाली बल्लाळेश्वर मंदिराच्या मागे एक भेदक, टोपी सारखा दिसणारा कातळकडा म्हणजेच सरसगड. मंदिराच्या मागूनच हमरस्त्यावरून पुढे गेल्यावर डावीकडे वळल्यावर एक वाट गडावर  जाते. वाट तशी सोप्पीच आहे. जेमतेम सव्वा किंवा दीड तासात किल्ल्यावर पोहोचता येते. वाटेत एक सुकलेल पाण्याच टाक आहे. पहिला टप्पा चढल्यावर सरसगडाची उभी कातळ भिंत अजून रौद्र रूप धारण करू लागते.म्हणूनच नैसर्गिक तटबंदी लाभलेल्या या किल्ल्याला तशी फारशी अशी तटबंदी अशी नाहीच आहे. वाटेत २ टप्पे चढून गेल्यावर एक छोटी पण खडी चढ लागते. तिथून मागे वळून पाली शहर समोर दिसते. थंडीच्या दिवसात तर धुक्याची चादर पूर्ण पाली ने ओढलेली असते. जर आकाश निरभ्र असेल तर पाली तालुक्यातीलच सुधागड, आणि पुण्यात मोडणारा तैलबैला यांचे दर्शन होते.
इथून पुढे एका भूयारासारख्या भासणार्या पहारेकर्यांच्या निवासाची जागा आहे. इथे धोपार्यानेच रेंगत आत जावे, आत गेल्यावर एक माणूस उभा राहू शकेल एवढी उंची आहे. सरसगडाचे वैशिष्ठ्य म्हणजे कातळात कोरलेल्या ९६ पायऱ्या. एका बाजूला उंच कातळ भिंत आणि दुसऱ्या बाजूला खोल दरीतर धडकीच भरायला लावते. भिंतीचा आधार घेत इथून वर चढावे. या पायऱ्या म्हणजे शत्रूला थोपवण्यासाठीच्या उत्तम जागा. पायऱ्या चढल्यावर गोमुखी स्वरूप असलेल्या आणि अखंड कातळात कोरलेल्या दरवाज्याचे दर्शन होते. तिथेच पहारेकार्याच्या देवड्या पण आढळतात. ४ -५ माणसे झोपु शकतील अशी हि जागा. गडावर फार असे अवशेष नसले तरी कातळात कोरलेल्या अनेक गुफा, गुफांमध्ये अनेक ठिकाणी शिल्प कोरली आहेत. त्यातील खास पाहण्यासारखी म्हणजे एका गुफेच्या माथ्यावर असलेले गणेशाचे लहानसे शिल्प, आणि एक मोठे भित्तीशिल्प आहे त्यात सीता हरणाची गोष्ट कोरून ठेवली आहे असा माझा अंदाज. मागचा दरवाजा हा पूर्ण पणे बांधून काढला आहे. इथेच वर बारमाही पाण्याचे टाके आहे. जेव्हा गावात पाणी नसते तेव्हा इथून पाईप लाऊन पाणी काढले जाते. इथूनच थोडे वर चढून किल्ल्याच्या माथ्यावर जाता येते. भोलेनाथाचे सुंदर असे मंदिर इथे आहे. एका पीराचेहि अवशेष इथे आहेत. महाशिवरात्रीला भोलेनाथाच्या मंदिरात मोठा उत्सव असतो. मंदिराच्या बाजूलाच एक कमळाच्या फुलांनी भरलेले एक तळे आहे. माथा लहानच असला तरी तहळणी साठी उत्तम आहे. घाट माथ्याकडून कोकणात उतरणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठीच याचा वापर केला जात असावा.
असा हा सरसगड. पाली बाल्लाळेश्वराच्या मंदिरात (धुंडी विनायाकाच्या मंदिरात) याचा उल्लेख आढळतो.
या सरसगडावर गिरगावातील यशवंती Adventures तर्फे दुर्ग संवर्धनाचे कार्य गेली २ वर्ष सातत्याने राबविण्यात येत आहे.  मुख्य दरवाज्यातून गडावर जाणार्या पायऱ्या, गडाचे बुरुज, मुख्य आणि मागील दरवाज्याची स्वच्छता, गडावर माहिती फलक लावणे अशा विविध प्रकारची कामे केली जात आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
संतोष गुरव – ९२२२९२२०४८
भरत म्हदये – ९७७३४१०७१७

गौरव भावे- ९६९९८१४६२५